उरुळी कांचनमध्ये पिसाळलेल्या श्वाणाचा धुमाकूळ १४ जणांना चावा, लहान मुली व महिलांचा समावेश
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत आज सायंकाळी पिसाळलेल्या श्वाणाने (कुत्र्याने) अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल १४ नागरिकांना चावा घेतला, अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात लहान मुलींसह महिलांचा समावेश असून, नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन परिसरातील बायफ रोड तांबे वस्ती येथे ५ जणांना, इंदिरानगर येथे ३ जणांना, तसेच दत्तनगर परिसरात ६ जणांना पिसाळलेल्या श्वाणाने चावा घेतला. यामध्ये एकूण ९ लहान मुले आणि ५ महिला असे एकुण १४ जण जखमी झाल्याचे माहिती समोर आली आहे.
जखमींना तत्काळ उपचारासाठी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ससून ला हलविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत हनुमंते यांनी सांगितले.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठी घबराट आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. स्थानिक नागरिकांकडून संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली असून, दत्तनगर व आसपासच्या भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी तातडीने मोहिम राबवावी, अशी मागणी दत्तनगर येथील नागरिकांकडून जोर धरत आहे.
महिलांच्या वतीने सांगण्यात आले की, ग्रामपंचायत हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास गंभीर परिणाम नाकारता येत नाही.























