पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे अपघातांची मालिका कायम ; दोन दिवसात चार अपघात- एकाचा मृत्यू, दोन गंभीर
✍️ नितीन करडे
पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (७ नोव्हेंबर) पहाटे उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरच १६ टायर ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात रस्त्यालगत असलेला स्ट्रीट लाईटचा खांब तुटून अर्धवट रस्त्यावर कोसळला. त्यामुळे वाहतूक धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
“पोलीस स्टेशन समोरच अपघात, खांब मात्र अर्धवट रस्त्यावरच पडून पुन्हा अपघाताची शक्यता, याच ठिकाणी अनेक अपघात”
याच दरम्यान, मध्यरात्री इनामदार वस्ती परिसरात दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत सुरेश कुमार दस (वय २३, रा. बिहार) हे जखमी झाले असून अविनाश यादव (वय ३५) यांचा मृत्यू झाला आहे. जखमींना कस्तुरी रुग्णवाहिका चालक संतोष झोंबाडे व माऊली लाड यांनी तातडीने उपचारासाठी रवाना केले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
“दोन दिवसांत चार अपघात”
याआधी दोन दिवसांपूर्वीच उरुळी कांचन येथील इरिगेशन कॉलनी आणि कस्तुरी चौकात वेगवेगळे दोन अपघात झाले होते. त्यात एका महिलेला गंभीर दुखापत झाली होती. सतत घडत असलेल्या अपघातांमुळे स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघाताचे कारण — दुभाजकावरील गतीरोधक?
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोरच्या दुभाजकाजवळ सोलापूर दिशेला असलेल्या गतीरोधकावरून जाताना एका टेम्पो चालकाने अचानक ब्रेक मारला. पाठीमागून येत असलेल्या (एमएच १२ यू एम १०३३) ट्रकचा चालक टेम्पोचा अंदाज न आल्याने त्याने वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक थेट दुभाजकावर चढवला. यात दुभाजकावरील स्ट्रीटलाईटचा खांब तुटून रस्त्यावर पडला.
अपघातामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे. संबंधित ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असल्याने स्थानिक नागरिकांनी रस्ता दुरुस्ती, योग्य सिग्नल, स्ट्रीटलाईट व गतीरोधकांची पुनर्रचना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

























